म्हापसा - हरफडे बागा येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये ४ पर्यटक आणि १४ कर्मचार्यांचा समावेश असून आणखी ७ मृतदेहांची ओळख पटली नाही. या दुर्घटनेत ६ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
३ वर्षापूर्वी या क्लबची स्थापना करण्यात आली होती. ज्या जागेवर क्लब आहे त्याठिकाणी मिठागरे होती. त्यानंतर तिथे हा क्लब तयार करण्यात आला. क्लबची उभारणी पाण्यात केली असून आत प्रवेश करणे आणि बाहेर पडण्यासाठी एकमेव लाकडी पुलाचा मार्ग बनवण्यात आला होता. पूर्णपणे लाकडाचा वापर करून रचना करण्यात आलेल्या या क्लबच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. त्यालाच जोडून खाली तळमजल्यावर किचन होते. आगीच्या धुराचे लोळ तळमजल्यात शिरले. त्यामुळे किचनमध्ये असणारे कामगार आतमध्येच अडकले. धुरामुळे अनेकजण गुदमरून दगावले. मृतांत किचममध्ये काम करणारे कर्मचारीच जास्त आहेत. एक्झिट सुविधा किचनमध्ये नसल्याने अडचणीत जास्त भर पडली. कर्मचारी गुदमरण्याचे हे प्रमुख कारण बनले.
क्लबमध्ये लाकडी संरचना, सजावट आणि ज्वलनशील साहित्यामुळए काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच म्हापसा, पणजी आणि कळंगुट अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही स्वयंसेवक म्हणून मदत केली. अनेक मृतदेह ओळखण्याजोगे नसल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड ठरणार आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संबंधित घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. अग्नितांडवात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रूपये आणि जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून केली जाणार आहे. दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. बाधितांना सर्वतोपरी मदत करा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तर ही केवळ एक दुर्घटना नाही तर सुरक्षा आणि प्रशासनाचे गुन्हेगारी अपयश आहे. सखोल, पारदर्शक चौकशी करून या घटनेची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. अशा दुर्घटना पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.
मध्यरात्री काय घडले
शनिवारी रात्री गोव्यातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान २५ जणांचा मृत्यू. ही आग सिलिंडरच्या स्फोटामुळे लागल्याचा पोलिसांना संशय आहे. उत्तर गोव्यातील अर्पोरा भागातील नाईट क्लबमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये काही पर्यटकांचा समावेश आहे. मृतांपैकी बहुतेक क्लबचे कर्मचारी असल्याचे मानले जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, मृतांमध्ये बहुतेक नाईट क्लबमधील स्वयंपाकघरातील कर्मचारी होते. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिले की, गोव्यातील अर्पोरा येथील दुर्घटनेने खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. मी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जी यांच्याशी परिस्थितीबद्दल बोललो आहे. राज्य सरकार बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने या घटनेत मृत आणि जखमींना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर लिहिले की, गोव्यातील अर्पोरा येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये देण्यात येतील. गोव्याचे डीजीपी आलोक कुमार म्हणाले की, अरपोरा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिस नियंत्रण कक्षाला रात्री १२:०४ वाजता (शनिवारी मध्यरात्री) आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बहुतेक मृतदेह रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात सापडले आहेत. आगीचे कारण सध्या तपासाधीन आहे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली जाईल.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, अधिकार्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. जखमींना आणि पीडितांच्या कुटुंबियांना वैद्यकीय मदत आणि आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले आहे की, गोव्यातील अर्पोरा येथे झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. स्थानिक प्रशासन बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहे आणि बाधितांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. या घटनेनंतर गोव्यातील क्लबमधील अग्निसुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.